परळी न्यायालयाने 500 रुपये दंड ठोठावला; 23 जानेवारी रोजी पुढील सुनावणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांना 15 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार बुधवारी (दि. 18) रोजी श्री. ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. याप्रकरणी आता न्यायालयाने राज ठाकरे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावत त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द केला आहे.

राज ठाकरेंना ऑक्टोबर 2008 मध्ये मुंबईत अटक झाली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले होते. परळीतील धर्मापुरी पॉइंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आण चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता.
राज ठाकरे यांचे वकीलांनी वैद्यकीय कारणांमुळेच राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही, असा युक्तीवाद करीत अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने ते मान्य करीत मोठा दिलासा दिला. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.
